सोलापूर : कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील नागनाथ गरड या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देऊन शतावरी या औषधी वनस्पतीची लागवड करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे केळीच्या माहेरघरात आता शतावरी पिकाची चर्चा रंगू लागली आहे.
कंदर हे गाव केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. या गावाला केळीच्या पिकाने एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. असे असले, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न आता एका टप्प्यावर स्थिरावले आहे. उत्पन्नवाढीला काही मर्यादा आहेत. अलीकडच्या काळात केळ्यांना चांगला दर मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच अति उष्णता व वादळी वाऱ्यांमुळे केळीचे पीक धोक्यात आले आहे. म्हणूनच केळी पिकाला पर्यायी पिकाच्या शोधात असताना नागनाथ गरड यांना शतावरी पिकाची माहिती समजली. या पिकाबद्दल अधिक माहिती घेऊन, अभ्यास करून त्यांनी शतावरी लागवडीचा निर्णय पक्का केला.
गरड यांनी पाच एकरावर शतावरीची लागवड करून ती यशस्वीही करून दाखवली. शतावरी हे प्रामुख्याने उत्तर भारतात पिकणारे पीक आहे. कंदर येथील उष्ण व कोरड्या हवामानातही हे पीक चांगले आल्याचे गरड यांनी सांगितले. गरड यांना शतावरीचे एकरी ११ ते १२ टन उत्पादन मिळाले आहे. सध्या तीन एकरांतील शतावरीची काढणी झाली असून, त्यापासून सुमारे ३० ते ३५ टन उत्पादन मिळाले आहे. गरड यांनी शतावरीच्या ओल्या मुळ्या ५० रुपये प्रति किलो या हमीभावाने एका कंपनीला विकल्या आहेत. त्यामुळे त्यांना एकरी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
‘शतावरी हे आपल्याकडे पीक नवीन आहे. शतावरी खरेदीदार कंपन्या खूप आहेत; मात्र त्या कंपन्या शतावरी कमीत कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करत अतसतात. तसेच या कंपन्या शतावरीच्या रोपांची विक्रीही जास्त दराने करतात. या दोन गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली, तर त्यांचे नुकसान तर होणार नाहीच; मात्र त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल,’ असे गरड यांनी सांगितले.
पारंपरिक पिकाला बगल देऊन नवे पीक घेण्याचे धाडस गरड यांनी दाखविले. तसेच, त्यासाठीचा अभ्यास करून ते पीक त्यांनी घेतले. त्यामुळे आपल्या उत्पन्नात दुप्पट वाढ साधण्याची किमया त्यांना जमली आहे. शेतकऱ्यांनी अभ्यास करून आपापल्या भागात योग्य त्या औषधी वनस्पतींची लागवड आवर्जून करावी, असा सल्लाही नागनाथ गरड यांनी दिला.
‘शतावरीच्या लागवडीतून मला यंदा माझ्या नेहमीच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात माझा हातभार लागला आहे,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.